भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तहसील कार्यालय येथे फ्रीज परिसर तसेच शौचालयामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण, दुर्गंधी व अस्वच्छता पसरलेली असून नागरिकांच्या आरोग्याशी गंभीरपणे खेळ केला जात असल्याचा आरोप करत पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.सदर तक्रारीमध्ये तहसील कार्यालयातील स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असून घाणीमुळे डास, माश्या व विविध संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या “स्वच्छ भारत अभियान” तसेच पर्यावरण संरक्षण नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, सार्वजनिक आरोग्य नियम व घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत अशा प्रकारची अस्वच्छता ही दंडनीय बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भातील प्रत्यक्ष परिस्थिती दर्शविणारा व्हिडिओ पुरावा देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.तक्रारीमध्ये तहसील कार्यालय परिसराची तात्काळ स्वच्छता करणे, नियमित निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करणे तसेच निष्काळजी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही तक्रार देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे, उत्तर महाराष्ट्र संघटक तथा जळगाव जिल्हाध्यक्ष, पर्यावरण संवर्धन व विकास समिती यांच्या वतीने करण्यात आली.

