जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ‘सखी (वन स्टॉप सेंटर)’ योजना पीडित व संकटग्रस्त महिलांसाठी हक्काचा आधारवड ठरत आहे. एकाच छताखाली विविध अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देत या केंद्रामार्फत महिलांना तातडीची आणि सर्वंकष मदत दिली जात आहे.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या या केंद्रात हिंसाचारग्रस्त, बलात्कार पीडित, लैंगिक अत्याचारग्रस्त, घरगुती हिंसाचार पीडित, ॲसिड हल्ल्यातील बळी, तस्करीच्या घटनांतील पीडित, जादूटोणा प्रकरणातील महिला, हुंडाबळी प्रकरणे, बाल लैंगिक अत्याचारग्रस्त, भ्रूणहत्या पीडित महिला, बालविवाहातील पीडित तसेच सायबर गुन्ह्यांतील महिलांना मदत केली जाते.
‘सखी’ केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे पीडित महिलांना एकाच ठिकाणी त्यांच्या गरजेनुसार वैद्यकीय सेवा, कायदेशीर मदत, समुपदेशन, पोलिस सहाय्य, तात्पुरता निवारा आणि मानसिक आधार उपलब्ध करून देणे. या केंद्रामुळे महिलांना विविध कार्यालयांच्या फेर्या मारण्याची गरज उरत नाही, तर तातडीने सर्व सेवा उपलब्ध होतात.या योजनेचा लाभ सर्व वयोगटातील महिलांना तसेच १८ वर्षांखालील मुलींनाही दिला जात असून, संकटग्रस्त महिलांच्या पुनर्वसनासाठी हे केंद्र प्रभावीपणे कार्यरत आहे.
दरम्यान, कोणत्याही अडचणीत सापडलेल्या महिलांनी तातडीने महिला हेल्पलाईन क्रमांक १८१, १०९८ किंवा ०२५७-२९९८३११ वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

